श्रीरामपूर हदरले हाॅटेल मालक आकाश दुबया चाकुने भोसकले
घाडगे न्यूज| प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात शनिवारी दुपारनंतर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहर हादरून गेले. शहरातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण हॉटेलचे मालक आकाश शेखर दुबया यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे चार वाजल्यानंतर लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये काही व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले. हल्लेखोरांनी आकाश दुबया यांच्यावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वैयक्तिक वैर, व्यावसायिक स्पर्धा किंवा इतर कोणत्या कारणातून हा हल्ला झाला का, याचा सर्व बाजूंनी पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.
या घटनेनंतर श्रीरामपूर शहरातील व्यापारी वर्गात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या हत्येमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि शहरात अधिक प्रभावी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन तपासाला गती द्यावी, आरोपींना तातडीने अटक करून श्रीरामपूरमधील वाढत्या गुंडगिरीवर कठोर आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नयेत, असेही सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असून लवकरच घटनेचा उलगडा होईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment