राजपुत्र बोललेच नाही मात्र राजकारणात मौन चालत नाही
राजपुत्र बोललेच नाही मात्र राजकारणात मौन चालत नाही! भाष्य।शिवाजी घाडगे महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष एका व्यक्तीकडे खिळले होते. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. पक्षातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. व्यासपीठावर आल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता होती. मात्र सुरुवातीला ते काहीसे संकोचलेले दिसले. काही क्षण ते शब्द शोधत असल्याचे जाणवले आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. भाषण अपेक्षेपेक्षा लहान राहिल्याने त्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. राजकारणात एखादे भाषण हे केवळ शब्दांचे संकलन नसते. ते नेतृत्वाचा आत्मविश्वास, अभ्यास, विचारांची स्पष्टता आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते यांचे प्रतिबिंब असते. म्हणूनच अमित ठाकरे यांच्या या अल्प भाषणाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचवेळी एका भाषणावरून एखाद्या नेत्याचे संपूर्ण राजकीय मूल्यमापन करणेही तितकेच चुकीचे ठरते. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत वक्तृत्वाला नेहमीच मोठे स्थान र...