अशोकचे ठेविदार करताहेत शोक संकट बॅकेवर की व्यवस्थापनावर?
अशोकचे ठेवीदार करताहेत शोक; संकट बँकेवर की व्यवस्थापनावर? भाष्य।शिवाजी घाडगे सहकारी बँक म्हणजे केवळ इमारत, काऊंटर, संगणक आणि व्यवहारांची यंत्रणा नव्हे. ती हजारो सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशावर उभी असलेली विश्वासाची संस्था असते. त्यामुळे एखाद्या सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादले जातात, तेव्हा त्याचा धक्का केवळ बँकेच्या व्यवस्थापनाला बसत नाही; त्या धक्क्याची सर्वाधिक झळ ठेवीदारांना बसते. श्रीरामपूर मुख्यालय असलेल्या अशोक सहकारी बँकेवर आरबीआयने घातलेले निर्बंध त्यामुळेच गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. ‘अशोकचे ठेवीदार करताहेत शोक’ हा शब्दप्रयोग कदाचित भावनिक वाटेल; परंतु सध्या ठेवीदारांच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आणि अनिश्चितता दुर्लक्षित करता येणार नाही. बचत खात्यात, चालू खात्यात किंवा मुदत ठेवीत ठेवलेला पैसा हा बहुतांश सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कष्टाचा असतो. तो पैसा अचानक वापरता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली की चिंता होणे स्वाभाविक आहे. आरबीआयने सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. नवीन कर्जवाटप, कर्जाचे नूतनीकरण, नवीन गुंतवण...