श्रीरामपूर च्या शांतेवर गुंडाचे सावट
श्रीरामपूरच्या शांततेवर गुंडगिरीचे सावट! स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण हॉटेलचे तरुण व्यावसायिक आकाश दुबया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. बुधवारी या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. अवघ्या तीस वर्षांच्या तरुण व्यावसायिकाची भरदिवसा, त्याच्या वडिलांसमोर निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. हल्ल्यावेळी वडिलांसमोर घडलेला हा थरारक प्रसंग पाहून ते अक्षरशः हतबल झाले. काही क्षण त्यांना काय घडत आहे याचाही अंदाज आला नाही. या घटनेने दुबया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील व्यापारी वर्गात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये जेवण न मिळाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले. अशा क्षु...