संजलसंपदा विभागाचा विखे पॅटर्न
जलसंपदा विभागाचे ‘रिपोर्ट कार्ड’ : पारदर्शकतेचा नवा पायंडा की राजकीय संदेश? रिपोर्ट कार्ड घाडगे न्यूज ॥ शिवाजी घाडगे ॥ राज्याच्या प्रशासनात एखाद्या विभागाने स्वतःहून वर्षभराच्या कामाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध करून तो थेट मुख्यमंत्रीसमोर सादर करणे, ही बाब सामान्य नाही. जलसंपदा विभागाचे मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केलेले ‘रिपोर्ट कार्ड’ हे केवळ कामगिरीचे दस्तऐवजीकरण नाही; तर तो प्रशासनातील उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि राजकीय संदेश यांचा संगम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा अहवाल सादर होणे आणि त्यात कृष्णा–गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प, नदीजोड योजना, अतिक्रमण हटाव, ‘लँड बँक’ निर्मिती यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात येणे, यामागे स्पष्ट राजकीय आणि प्रशासकीय गणित दिसते. पाणी हा केवळ विकासाचा मुद्दा नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, उद्योग आणि सामाजिक स्थैर्याशी थेट निगडित आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या कामगिरीचा थेट परिणाम राज्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होणार आहे. ‘विकसित भारत २०४७’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी राज्यातील जलव्यव...