संवत्सरी:अंतरमनातील अधार दूर करून क्षमा मागण्याचा दिवस
संवत्सरी : अंतर्मनातील अंधार दूर करून क्षमाशीलतेचा दीप प्रज्वलित करण्याचा दिवस! धर्मसंस्कृती । शिवाजी घाडगे माणूस चंद्रावर पोहोचला, विज्ञानाने आकाशाला गवसणी घातली, तंत्रज्ञानाने जग जवळ आणले; परंतु माणसाच्या मनातील दुरावा मात्र अद्याप कमी झालेला नाही. भौतिक सुखसुविधांची रेलचेल वाढली, पण मनःशांतीचा शोध संपलेला नाही. संपत्ती वाढली, प्रतिष्ठा वाढली, अधिकार वाढले; मात्र राग, द्वेष, मत्सर, अहंकार आणि परस्परांतील कटुता यांचे सावटही तितकेच गडद झाले आहे. अशा वेळेस जैन धर्मातील संवत्सरी पर्व मानवजातीला अंतर्मुख करणारा आणि माणुसकीची जाणीव जागविणारा प्रकाशकिरण ठरतो. स्वतःच्या चुकांकडे प्रामाणिकपणे पाहण्याची, इतरांकडून क्षमा मागण्याची आणि मनात साठलेली कटुता दूर करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. हा केवळ धार्मिक विधींचा भाग नाही, तर मनुष्याच्या अंतःकरणाचे शुद्धीकरण करणारा एक महान संस्कार म्हणावा लागेल पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस म्हणजे संवत्सरी. जैन समाजबांधव या दिवशी वर्षभरातील आपल्या आचार-विचारांचे आत्मपरीक्षण करतात. जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त करतात. ...