बैल पोळा मात्र शेतकऱ्यांच्या ताटातील भाकरीच काय
बैलांना पुरणपोळी, पण शेतकऱ्यांच्या ताटात भाकरीचा प्रश्न! वास्तव।शिवाजी घाडगे बैलपोळा आला की गावाकडची माती जागी होते. बैल सजतात, घराघरांत पुरण शिजते, अंगणात रांगोळ्या उमटतात आणि बळीराजा आपल्या कष्टकरी सवंगड्याची पूजा करतो. परंतु या उत्सवाच्या आनंदामागे आज एक बोचरा प्रश्न उभा आहे बैलांच्या ताटात पुरणपोळी आहे; पण बळीराजाच्या ताटात भाकरी तरी आहे का? महाराष्ट्राच्या शेतीसंस्कृतीत बैलपोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक यंत्रयुगाने शेतीचे स्वरूप बदलले. ट्रॅक्टर आले, आधुनिक अवजारे आली, तंत्रज्ञानाने शेतीत प्रवेश केला; तरी बैलपोळ्याची परंपरा संपली नाही. कारण हा केवळ बैलांचा सण नाही. हा शेतकरी आणि त्याच्या कष्टकरी साथीदारामधील भावबंधाचा उत्सव आहे. वर्षभर शेतकऱ्याबरोबर उन्हातान्हात राबणाऱ्या बैलांना या दिवशी अंघोळ घातली जाते. शिंगांना रंग लावला जातो. बेगड लावले जातात. गळ्यात फुलांचे हार घातले जातात. अंगावर झुल चढवली जाते. घरातील महिला प्रेमाने पुरणपोळी तयार करतात आणि बैलाला नैवेद्य दाखवून त्याला गोड घास भरवतात. ही परंपरा पाहताना मन भरून येते. पण त्याच क्षणी प्रश्नही नि...