कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल....
कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल राजरंग।शिवाजी घाडगे राजकारणात यश अचानक मिळत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजन, संघटन बांधणी, जनसंपर्क आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. परीक्षेत अव्वल येणारा विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करून आपले ध्येय निश्चित करतो, त्याचप्रमाणे राजकारणातील मोठी पदे मिळविण्याचे स्वप्न पाहणारे नेतेही अनेक वर्षे आधीपासूनच आपली रणनीती आखत असतात. त्यामुळे एखादा नेता धार्मिक स्थळांना भेट देतो, जनसंपर्क वाढवतो किंवा आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यामागे केवळ श्रद्धा नसून राजकीय संदेशही दडलेला असतो. नुकतीच कोल्हापुरात महालक्ष्मीची ओटी भरल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सत्तेतील एका प्रभावशाली मंत्र्याने आगामी २०२९ च्या राजकीय समीकरणांचा विचार करून आतापासूनच तयारी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकारणातील प्रत्येक हालचालीचे अर्थ शोधले जात असताना या धार्मिक भेटीकडेही अनेकजण राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. गेल्या दशकात देशाच्या राजकारणात एका नेतृत्वाभोवती निर्माण...