गुणवंतांचा सत्कार की मानापानाचे राजकीय नाट्य
तरंग।शिवाजी घाडगे
अलीकडेच एका कार्यक्रमात खासदार मेघा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात आसनव्यवस्थेवरून झालेल्या वादाची राज्यभर चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत मराठा समाजातील तरुणांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मूळ उद्देश तरुणांच्या यशाचा सन्मान करणे हा होता. मात्र, कार्यक्रमात घडलेल्या घटनांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू गुणवंत विद्यार्थी न राहता राजकीय मानपानाचा वाद ठरला.
कार्यक्रमासाठी खासदार मेघा कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांना पहिल्या रांगेत बसवून नंतर जागेवरून उठविण्याऐवजी थेट व्यासपीठावर स्थान देणे अधिक उचित ठरले असते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कारण त्या लोकप्रतिनिधी असून संसदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवर खासदार आहेत. विशेष म्हणजे त्या पक्षनिष्ठ आणि सक्रिय महिला नेत्या म्हणूनही ओळखल्या जातात.
वादाच्या वेळी खासदार मेघा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना, "तुम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी नाहीत," अशा शब्दांत सुनावल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळ सोडणे पसंत केले. काहींच्या मते हा त्यांचा स्वाभिमानी निर्णय होता. सार्वजनिक कार्यक्रमात मानपानाला धक्का बसल्याची भावना निर्माण झाल्यास निषेध म्हणून कार्यक्रमातून बाहेर पडणे हा देखील एक राजकीय संदेश असू शकतो.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपमधील काही मराठा नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना या घटनेमुळे नव्याने खतपाणी मिळाले आहे. पक्षांतर्गत मतभेद, रुसवे-फुगवे किंवा नेतृत्वाच्या पातळीवरील स्पर्धा यांचा या वादाशी काही संबंध आहे का, यावरही राजकीय विश्लेषक चर्चा करत आहेत. मात्र, या सर्व चर्चा आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे कार्यक्रमाचा मूळ हेतू मागे पडल्याचे चित्र दिसून आले.
सोशल मीडियावर या प्रकरणाला जातीय आणि मान-सन्मानाच्या प्रश्नाचे स्वरूप देण्याचाही प्रयत्न झाला. विविध पोस्ट, प्रतिक्रिया आणि भाष्यांमधून जाती-पातीच्या मुद्द्यांवरून वाद रंगविला गेला. परिणामी, ज्यांच्या यशासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या गुणवंत युवक-युवतींच्या कर्तृत्वापेक्षा नेत्यांच्या खुर्च्या, आसनव्यवस्था आणि मानपानाच्या चर्चांनाच अधिक प्रसिद्धी मिळाली.
खरे तर अशा कार्यक्रमांमध्ये केंद्रस्थानी असायला हवेत ते यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे कष्ट. समाजातील तरुणांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या संघर्षकथा आणि यशाचा गौरव होणे अपेक्षित असते. मात्र, दुर्दैवाने अनेकदा राजकीय उपस्थिती आणि प्रोटोकॉलच्या वादांमुळे मूळ विषय बाजूला पडतो. या घटनेनेही नेमके तेच अधोरेखित केले आहे.
लोकप्रतिनिधींनी मान-सन्मानाच्या प्रश्नांपेक्षा कार्यक्रमाच्या उद्दिष्टाला प्राधान्य देणे आणि आयोजकांनीही प्रोटोकॉलचे भान ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा गुणवंतांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमही राजकीय वादाचे व्यासपीठ बनतात आणि समाजाला द्यायचा सकारात्मक संदेश हरवून जातो.
येथील मानपान खुर्चीचा वाद मुख्यमंत्रीच्या खुर्ची पर्यत गेला नाही म्हणजे बरे कारण शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरु असल्याचे वक्तव्य करून फोडा फोडीला फोडणी दिली असून भविष्यात खुर्ची वरुन बरेच काही राजकीय घडमोडी पाहवयास मिळतील एक मात्र खरे खुर्ची मिळे पर्यंत व्यक्ती कोठेही बसतो आणि मिळाल्यावर त्याचा अहकार जागा होतो या धुंदीत तो आपल्याचा माणसाला दुर जायला सांगतो आणि मन भेद झाले की खुर्चीला ग्रहण लागलेच समजा
सत्तेचा अहकार इतका भयानक असतो की आपल्याला खुर्ची देणाऱ्या देखील साधे आपल्या खुर्ची जवळ आलेले आपल्याला सहन होत नाही
Comments
Post a Comment