महात्मा फुले परिसरात हरित अभियान डाॅक्टर विलास खर्चे

महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘फुले हरित अभियान’ची सुरुवात
जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व; कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे प्रतिपादन
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
 जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, मातीची धूप रोखली जाते तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. याच उद्देशाने यावर्षीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात व्यापक स्वरूपात वृक्षलागवड करण्यासाठी ‘फुले हरित अभियान’ सुरू करण्यात येत असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत पाणलोट क्षेत्र विकास व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पाणलोट क्षेत्र परिसरात तसेच उद्यानविद्या प्रक्षेत्रावर ‘फुले हरित अभियान’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. खर्चे मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषी तंत्र शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, काष्टी-मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागप्रमुख तथा नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. विजयकुमार पाटील तसेच सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. विजू अमोलिक, डॉ. सचिन नलावडे आणि डॉ. सचिन नांदगुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रास्ताविकात डॉ. सचिन नांदगुडे यांनी सांगितले की, पाणलोट क्षेत्राचा विस्तार सुमारे १,२०० हेक्टर असून या परिसरात पाणी साठविण्यासाठी खोल सलग समतल चर, बंदिस्त वाफे आणि नाला बंधारे उभारण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे १२३.४० टीसीएम पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यात यश आले आहे. यंदा या पाणलोट क्षेत्रात २,५३२ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये बांबू, हिरडा, बेहडा, अर्जुन, जांभूळ आणि आंबा या प्रजातींचा समावेश आहे.
यावेळी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच उद्यानविद्या विभागाचे कर्मचारी, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन