आता आम्ही आहोत तुमच्या समवेत
राजरंग।शिवाजी घाडगे
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच सुजय विखे-पाटील उपस्थित होते.
या सत्कारानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री सत्कार करताना नेमके काय म्हणाले असतील, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. "घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी," असे काहीसे आश्वासक शब्द त्यांनी उच्चारले असतील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काही जण तर मिश्किलपणे असेही म्हणू लागले आहेत की, "तुम्हाला पक्षात घेतले आणि अवघ्या काही दिवसांत आमदारकीची संधी मिळाली; आता तरी मामांना सांगा या ईकडे अर्थात हा राजकीय उपहासाचा भाग असला तरी सध्याच्या राजकारणातील वेगवान घडामोडी पाहता अशा चर्चांना खतपाणी मिळणे स्वाभाविक आहे.
विशेष म्हणजे, बिनविरोध निवड होणे ही कोणत्याही राजकारण्याच्या कारकिर्दीतील मोठी घटना मानली जाते. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः अभिनंदन करत असताना त्यामागे केवळ औपचारिक शुभेच्छा होत्या की भविष्यातील राजकीय संदेश, यावर चर्चा रंगणे साहजिक आहे.
राजकारणात योगायोग कमी आणि संकेत जास्त असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे या भेटीचे छायाचित्र पाहून कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक आपापल्या पद्धतीने अर्थ लावत आहेत. मात्र खरे काय आणि राजकीय कल्पनारंजन काय, हे येणारा काळच ठरवेल.
सध्या तरी एवढेच म्हणता येईल की, सत्काराच्या एका फोटोने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत आणि त्यांची उत्तरे शोधण्याचे काम राजकीय रसिकांनी सुरू केले आहे. राजकारणात कधी कोण कुणाच्या जवळ येईल आणि कधी दूर जाईल, याचा अंदाज बांधणे हेच सर्वात कठीण काम ठरत आहे.
Comments
Post a Comment