आब्या च्या भुरी रोग नियंत्रणावर सल्ला
आंबा भुरी रोगाबाबत शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सल्ला
डिसेंबर व जानेवारी महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्यास सुरुवात होताच आंबा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो असा इशारा राहुरी कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. संजय कोळसे व डॉ. प्रवीण खैरे यांनी दिला आहे. या कालावधीत हवामान ढगाळ राहणे, रात्रीचे तापमान दिवसाच्या तुलनेत कमी असणे व दिवसा २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास भुरी रोग झपाट्याने पसरल्याचे आढळून येते.
हा रोग ओयडियम मॅन्जीफेरी या बुरशीमुळे होतो. या बुरशीची बीजे वाऱ्यामार्फत पसरत असून मोहोर व कोवळ्या पालवीवर प्रथम लागण दिसून येते. सुरुवातीला मोहोराच्या दांड्याच्या टोकाजवळ पांढऱ्या रंगाची तंतूमय बुरशी दिसते व पुढे संपूर्ण मोहोरावर तिचा प्रसार होतो. बुरशी पेशीतील अन्नरस शोषून घेत असल्याने मोहोराची वाढ खुंटते. रोग तीव्र झाल्यास ७० ते ८० टक्के तर काही वेळा १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कोवळ्या पानांवर रोग आल्यास पाने तांबूस होऊन वाळतात व गळून पडतात. फळधारणेपूर्वी रोग आल्यास फुले गळून पडतात, तर फलधारणेनंतर रोग उद्भवल्यास फळांच्या देठांवर परिणाम होऊन फळगळ वाढते.
या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी मोहोर येण्याच्या १५ दिवस आधीच पहिली प्रतिबंधात्मक फवारणी करावी. त्यासाठी पाण्यात मिसळणारे सल्फर ८० टक्के डब्ल्यू.पी. २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. रोगाची लक्षणे दिसताच अॅझोक्सीस्ट्रोबिन २३ टक्के एस.सी. १ मिली किंवा हेक्साकोनाझोल ५ टक्के ई.सी. १ मिली प्रति लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. पूर्ण वाढलेल्या झाडासाठी साधारणत: २० लिटर द्रावण आवश्यक असून, १५ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ फवारण्या कराव्यात. फळधारणेनंतर फवारणीपूर्वी मोहोर स्वच्छ करून फवारणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. डिसेंबर–जानेवारी महिन्यात वेळेवर उपाययोजना न केल्यास आंबा उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून शिफारसीनुसार फवारण्या करून भुरी रोगाचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे.
Comments
Post a Comment