भेसळ दुधाचा जनतेच्या जीवाशी खेळ सुरु
भेसळ दुधाचा जनतेच्या जीवाशी खेळ भेसळ। शिवाजी घाडगे "दूध" हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर शुद्धता, पवित्रता, आरोग्य आणि पोषण यांचे चित्र उभे राहते. आईच्या दुधानंतर मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा आहार म्हणून दुधाकडे पाहिले जाते. नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात दुधाला अनन्य महत्त्व आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो. "श्वेतक्रांती"ने देशाला आत्मनिर्भर बनविले, लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. मात्र आज या श्वेतक्रांतीलाच भेसळीच्या काळ्या सावलीने ग्रासले आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही केवळ एक गुन्हेगारी कारवाई नाही; तर ती आपल्या अन्नसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि समाजात बोकाळलेल्या नफेखोरीच्या विकृत मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे. ही कारवाई उघड करते की काही लोक अवघ्या काही रुपयांच्या रासायन...